Tuesday, July 30, 2013

रस्ता नाही, शाळा इमारत निकृष्ट आणि अंगणवाडीही नाही
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिक्षणासाठी ग्रामस्थांचा आटापिटा
महाड - छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळेवाडी येथील प्राथमिक शिक्षणाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे. शाळेची इमारत संपूर्ण गळत असल्याने मुलांना शाळेत बसण अवघड झाले आहे. शाळेच्या भिंतींना तडे गेल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही याबाबत पालकांच्या मनात साशंकता आहे.
महाड तालुक्यातील रायगडवाडीमधील नेवाळेवाडीतील ही शाळा 2005 साली बांधण्यात आली. शाळेला स्लॅबची मंजूरी असताना देखील शाळेवर पत्रे टाकण्यात आले. या शाळा इमारतीमध्ये ब-याच प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे येथून सांगितले जाते. सोसाट्याच्या वा-यापुढे हया इमारतीवरील पत्रे तग धरू शकले नाहीत.  2007 च्या फयान वादळामध्ये यावरील पत्रे पाचशे मीटर अंतरापर्यत उडाले होते.  शाळेच्या या इमारतीची पुन्हा दुरूस्ती करूनही शाळेची गळती सुरूच आहे. शिक्षक व ग्रामस्थ यांनी मिळून पत्र्यावर प्लॅस्टीक टाकून त्यावर दगड रचून संरक्षण केले आहे. तरीही भिंतीतून पाणी गळून मुलांना शाळेत बसण अवघड झाले आहे.  शाळेचे बाधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने शाळेच्या इमारतीला आता तडे जात असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
 रायगडच्या पायथ्याशी किमान ३०० लोकसंख्या असलेली या  नेवाळे वाडीत सर्व रहिवाशी हे धनगर समाजाचे असून शेती व दुधदुभती जनावरे हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे. या गावाकडे  येण्यासाठी किमान २ कि मी पायपीट करावी लागते. पावसाळ्यात  या रस्त्याची अतिशय  बिकट अवस्था होते.  रायगडवाडी पासून 700 मीटर पर्यंतचा रस्त्याचे खडीकरण झाले असून पुढील दीड किलोमीटरचा रस्ता म्हणजे दगड व चिखलाची पायवाटच आहे.   अतिवृष्टीच्या काळात बाजूच्या गावातील मुलांना शाळेत येणे कठीण जाते  त्यामुळे  मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी अनेक समस्यांना  सामोरे जावे लागत असल्याने पटसंखेत घट होत आहे परिणामी शिक्षणाचा दर्जाही खालावत आहे.
अंगणवाडी देखील नाही
येथील प्राथमिक शिक्षणाची अवस्था पाहताना या नेवाळेवाडीमध्ये बालवाडीसाठी 25 मुले अंगणवाडीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले. गेली चार वर्षे येथील ग्रामस्थ अंगणवाडीची मागणी करीत आहेत परंतु येथे महाड पंचायत समिती अंगणवाडी देऊ शकली नाही. त्यामुळे अंगणवाडीच्या मुलांसाठी असलेल्या शासकीय फायद्यांपासून येथील लहान मुले वंचित राहिली आहेत.
केंद्रशिक्षकाची वर्षातून एकदाच भेट
नेवाळेवाडीतील या शाळेत दोन शिक्षक असून दोन्ही शिक्षकांना येथे येण्यासाठी पराकाष्टा करावे लागते. या नेवाळेवाडीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत केंद्रप्रमुखांची वर्षातून एकदाच व्हिजीट झालेली दिसते. नोंदवहीतील नोंदीप्रमाणे यंदा जून महिन्यात तर 2012 सालात एप्रिल महिन्याव्यतिरिक्त 2012 सालात केंद्रशिंक्षक या शाळेत आलेलेच नाहीत. यामुळे या शाळेच्या इमारतीच्या पडझडीची व येथील इणारतीच्या निकृष्ट बांधकामाबाबत शासनदप्तरी कोणतीही नोंद नाही.
रायगड किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी याच राजधानीजवळील ही नेवाङेवाडीच्या शाळेची ही अवस्था आहे. ही वाडीच पूर्णत दुर्लक्षित झाली आहे. या वाडीला जोडून नगरभुवर ते खर्डी हा रस्ता झाल्यास येथील पर्यटनामध्ये देखील वाढ होईल परंतु येथे कायम दुर्लक्ष केल्याने आता नेवाळेवाडी, नगरभुवन सारख्या गावात तरुणांचेही स्थलांतर सुरत, बडोदा याठिकाणी झाले आहे. त्यामुळे स्थिरावलेल्या वयस्कर ग्रामस्थांचे व लहान मुलांचे हाल बघवत नाहीत. परंतु या ठिकाणी सुविधा पुरविण्यात लोकप्रतिनिधीसह स्थानिक व राज्य शासनही कमी पडेत ही लाजीरवाणी गोष्ट आहे. 









भ्रष्ट अधिकारी, 
बळी लोभी कर्मचारी.....    30july2013




सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार हा चर्चेचा विषय ठरला आहे. भ्रष्टाचार आणि महसूल खात्यातील भ्रष्टाचार याबाबत आता तसे आश्चर्य वाटत नाही. परंतु हा भ्रष्टाचार इतका शिगेला पोहचला आहे की यावर आता ठोस पावले उचलायची गरज निर्माण झाली आहे. उपजिल्हाधिकारी जगन्नात वीरकर यांचा स्वीय सहाय्यक विनोद लचके याला जमीन बिनशेती प्रकरणात एकलाखाहून अधिक रक्कम रंगेहात घेताना पकडले. आणि त्यापुढची कमाल म्हणजे त्याच्या घरी सुमारे साठ लाखाची रोकड व काही चेक्स मिळाले. नियमानुसाल चालणा-या प्रशासनाला समांतर असे भ्रष्ट प्रशासन कसे हातात हात घालून कारभार करीत आहेत हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. यापूर्वी रायगडच्या उपजिल्हाधिकारी असलेले नितीस ठाकूर हे देखील कोट्यावधी रपयांच्या बेहिशोबी मालमत्तेबाबत आजही फरारी आहेत. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात कशापद्धतीने व किती दिमाखदार पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो हे यावरून सिद्ध होते.
सध्या रायगड जिल्हा हा आधुनिक विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आरसीएफ प्रकल्पानंतर सिडको, जेएनपीटी, ओएनजीसी आणि आताचा दिघी पोर्ट या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांकरीता लाखो हेक्टर जमीन येथील शेतक-यांनी दिली. परंतु त्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अजूनही योग्य न्याय मिळाला नाही. याचा अनुभव घेता पेण आणि उरण भागात येणारा महामुंबई सेझ सारखे प्रकल्प शेतक-यांनी रोखला. शहापूर धेरंड येथे येणारा रिलायन्सचा प्रकल्प देखील रोखला. परंतु दरम्यानच्या काळात काही हेक्टर जमीन या धनदांडग्यांच्या घशात गेली. या विकासाच्या प्रकल्पात महसूल खात्याची भूमिका महत्वाची असते. आणि लाखो रुपयांची तोडपाणी करण्यात काही अधिका-यांनी आपली विद्वत्ता पणाला देखील लावली. शहापूर धेरंड येथील सरकारी जमीन रिलायन्सच्या घशात घालण्यासाठी आता उपजिल्हाधिकारी जगन्नात वीरकर यांचे नाव पुढे येत आहे. याबरोबर असे अनेक प्रकल्पाकरीता धनदांडग्यांना मदत करणारे काही उच्च महसूल अधिकारी देखील भविष्यात पुढे येणार आहेत. सध्या दिल्ली मुंबई कारिडारच्या भूसंपादनात अनेक अधिका-यानी आपली स्वप्न रंगविली असतील परंतु हे प्रकल्प शेतक-यांच्या विरोधाच्या रेट्यापुढे थांबविल्याने त्यांचे स्वप्न भंगले असणार. या अशा प्रकल्पामुळे असंख्य शेतकरी व जमीनदलाल जमीनी बिनशेती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जातात आणि हे महसूल अधिकारी करोडो रूपयांचे धनी होतात. जे दलाल फसवणूक करतात ते अशा अधिका-यांना हाताशी धरून कामे करतात परंतु एखादा साधा शेतकरी आपली जमीन घराकरीता बिनशेती करून घ्यायला जातो. तेव्हा अधिका-याची अपेक्षा तो पूर्ण करतोच असे नाही. मग लचके सारखा लोभी माणूस असा बळी जातो. आणि ज्या अधिका-यामुळे हे खालच्या कर्मचा-याला आपले हात बरबटावे लागतात ते अधिकारी मात्र मोकाट सुटतात.
जमीन बिनशेती बरोबर रायगड जिल्ह्यातील रेती उत्खनन हा सुध्दा तितकाच भ्रष्टाचाराला खुलेआम निमंत्रण देणारा विषय आहे. या बरोबर साध्या जातीच्या दाखल्यापासून ते रेशनिंग कार्ड पर्यंत सारेच कर्मचारी, अधिकारी सामान्य माणसाकडून दहा रुपये घ्यायला देखील लाज बाळगत नाही हे विशेष
महसूल खात्याबरोबर पोलीस खात्यातील भ्रष्टाचार हा रस्त्यावर जाता येता पाहता येण्यासारखा विषय आहे. जिथे जिते पोलीस टॅप आहे तिथे अऩेक लोकांना हा नित्यनेमाचा विषय झालाय. ट्रॅफीक पोलीस कोळशाच्या किंवा रेतीच्या डम्परच्या चालकाला कसे खुणावतो आणि नोट कशी घेतो हे खुलेआम पाहताना भ्रष्टाचार किती शिष्टाचार बनतोय हे लक्षात येते.
रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर असंख्य  ठिकाणी पोलीस टॅप आहेत. अनेक अवजड वाहने यावरून जात असतात परंतु आरटीओ पेक्षा ट्रॅफीक पोलीसच याकडे लक्ष ठेवून असतात. रेती वाहतूक,कोळसा वाहतूक, जेएनपीटीतून येणारे ट्रॅालर्स या सा-यांकडून रोज गोळा होणारा पैसा मोजला तर मोजता येणार नाही इतका पैसा जमा होतोय हा पैसा जातो कुठे, यात कोण वाटेकरी आहेत, हेच पैसे परत मतदारांना आमीष म्हणून वाटले जातात की अधिका-यांच्या घरी जातात याचा शोध लावला पाहिजे.
तूर्त एवढेच की सध्या रायगडात महसूल खात्याचा पर्दाफाश झालेला आहे  आणि पोलीस खात्याचा पर्दा रस्तोरस्ती  फडकत आहे.

दीपक शिंदे, रायगड.


Sunday, July 21, 2013

महाड तालुक्यातील दहिवड गावात जमिनीतील आवाजाचे गूढ कायम

रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील दहिवड गावात जमिनीतून स्फोटासारखे आवाज येत असल्याने गावात महिलांसह पुरुष देखील भितीच्या छायेत आहेत. एकीकडे पूर, दरड अशा संभाव्य घटनाचा मागोवा घेणारे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन आता या आवाजाने बेजार झाले आहे.
रायगड जिल्ह्यात पडणारा मुसळधार पाऊस, डोंगरातून ओढ्यात खळाळणारे पाणी, धोक्याच्या पातळीपर्यंत वाढणारे नद्यांचे पात्र पाहता रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन जेरीस आलेले असताना महाड तालुक्यातील दहिवड गावातील जमिनीतून येणारे स्फोटासारखे आवाज आता आपत्कालीन व्यवस्थापनाला हादरवत आहेत. 3 जुलै रोजी आलेली तक्रार जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनापर्यंत गेल्यानंतर जिल्हा भूगर्भशास्त्र विभागापर्यंत जाण्यास तब्बल 12 दिवसाचा कालावधी लागला. या दिरंगाईमुळे आता दहिवड गावातील महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
1967-68 सालात आलेला भूकंप, त्यानंतर नानेमाची येथील जमिनीला पडलेल्या भेगा या घटनांनंतर 3 जुलैपासून येणारे हे भयावह आवाज दहिवड गावात चिंतेचा विषय बनला आहे. काल जिल्हा भूगर्भशास्त्र विभागाच्या पथकाने दहिवड गावाला भेट दिली. परिस्थितीची पाहणी केली, चर्चा केली परंतु ग्रामस्थांचे समाधान मात्र करू शकले नाहीत.
भूगर्भशास्त्र अभ्यासकांच्या मते हे परिणाम जमिनीची धूप, मातीचे उत्खनन, नदीतील रेतीचे उत्खनन आणि गावात बेसुमार झालेले बोअरवेल व त्यातून बाहेर आलेले पाणी. तरीही यात भिती बाळगण्याचे कारण नाही कारण या आवाजाबरोबर कोणताही हादरा बसत नाही हीच जमेची बाजू आहे.
आज तेरा दिवस झाले तरी या आवाजाचे गूढ उलगडले नाहीत. यामुळे दहिवड गावातील भय संपले नाही. या आवाजाने नक्की कोणती आपत्ती दहिवड गावात ओढवेल या चिंतेने आजही येथील ग्रामस्थ रात्ररात्र जागून काढीत आहेत.
इन्शुरन्स(Life Insurance) क्षेत्रातील कार्पोरेट एजंट म्हणून नावाजलेल्या पॅट्रान(patroun) या कार्पोरेट ग्रुपमध्ये मी सध्या काम करीत असून भारतातील सर्वच लाईप इन्शुरन्स कंपनीच्या पॅालीसी मी तुम्हाला देऊ शकतो. सध्या या ग्रुपमध्ये मी डीएम (development manager) या पदावर काम करीत असून आपल्याला इन्शुरन्स (Life Insurance) बाबत काही मार्गदर्शन हवे असेल तर अवश्य संपर्क साधा. माझा ईमेल आयडी dashindia09@gmail.com किंवा मोबाईल नंबर 8983918989, 8975918989 मार्फत संपर्क साधून आपल्याला हवे असलेल्या फायद्यासहीत आपण आपली पॅालिसी घेऊ शकता.
इन्शुरन्स(Life Insurance) क्षेत्रातील कार्पोरेट एजंट म्हणून नावाजलेल्या पॅट्रान(patroun) या कार्पोरेट ग्रुपमध्ये मी सध्या काम करीत असून भारतातील सर्वच लाईप इन्शुरन्स कंपनीच्या पॅालीसी मी तुम्हाला देऊ शकतो. सध्या या ग्रुपमध्ये मी डीएम (development manager) या पदावर काम करीत असून आपल्याला इन्शुरन्स (Life Insurance) बाबत काही मार्गदर्शन हवे असेल तर अवश्य संपर्क साधा. माझा ईमेल आयडी dashindia09@gmail.com किंवा मोबाईल नंबर 8983918989, 8975918989 मार्फत संपर्क साधून आपल्याला हवे असलेल्या फायद्यासहीत आपण आपली पॅालिसी घेऊ शकता.

Tuesday, July 2, 2013

दीपक अर्जुन शिंदे पत्रकार - सह्याद्री वाहिनी.... रायगड भूषण पुरस्कार प्राप्त...... सह्याद्री वाहिनीचा लक्स माणिक रत्न पुरस्कार 2012



 जिद्द माणसाला यशस्वी बनविते हे आमचेे मित्र दीपक शिंदे यांच्या धावपळीकडे पाहिले की पटते. गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दीपक शिंदे यांनी बसविलेला जम पाहिला की त्यांचे कौतुक करावेसे वाटते. दोन्ही पायाने अपंग असूनही गेली ११ वर्षे सह्याद्री वाहिनीचे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी अनेक अडचणींवर मात करुन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, गड संवर्धन, साहस, पर्यावरण जगतातील अनेक घटना, विविध व्यक्तिमत्वांवर प्रकाश टाकला आहे. त्याकरिता प्रसंगी कितीही चालावे लागले तरी त्यांनी माघार घेतली नाही. त्याचे फळ म्हणजे त्यांना नुकताच मिळालेला लक्स सह्याद्री माणिक सन्मान पुरस्कार. सह्याद्री वाहिनीचा हा वृत्तकथा व वृत्तसंकलनातील सर्वोच्च सन्मान दीपक शिंदे यांना मिळाला, त्यामुळे त्यांच्याविषयी असलेला अभिमान बळावला.
२ जुलै १९६४ रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथेे अर्जुन बाबाजीराव शिंदे या पोलिस खात्यातील अधिकार्‍याच्या कुटुंबात दीपक शिंदे यांनी जन्म घेतला. शिंदे कुटुंब हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदिवसे या गावातील. पोलिस खात्यातील नोकरीमुळे त्यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथेच मुक्काम झाला. दीपक शिंदे तीन वर्षांचे असताना त्यांच्या दोन्ही पायांना पोलिओ झाला. परंतु कणखर वडिलांमुळे दीपक यांचे आयुष्य दुःखमय झाले नाही. अतिशय परिश्रम घेऊन दीपक यांच्या वडिलांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे धाडस दिले. दीपकला एक भाऊ आणि दोन बहिणी. दोन्ही बहिणी कबड्डी, खोखोमध्ये प्रविण असल्यामुळे घरातच व्यायामाचे बाळकडू मिळाले. त्यांना वडिलांनी सायकल, पोहणे आणि व्यायाम करण्यास प्रोत्साहित केले. दीपक शिंदे यांनीही व्यायामास सुरुवात केली आणि आपल्या पोलिओने आलेल्या अपंगत्वावर मात केली. प्राथमिक शिक्षण पाली व श्रीवर्धन व त्यानंतरचे पदवीपर्यंतचेे सारे शिक्षण महाड येथे पूर्ण केले. स्वतःचा स्क्रीन प्रिटींगचा व्यवसाय प्रथम ठाणे येथे नंतर महाड येथे सुरु करुन छपाई कलेचा वेगळा ठसा महाड परिसरात उमटविला. कॉम्प्युटराईज्ड प्रिटींगचा पहिला व्यवसाय महाड येथे सुुरु करण्याचा मान त्यांना पटकावला आणि मंडणगड, खेड, रायगडमध्ये छपाईसाठी वेगळे नाव मिळविले. त्यानंतर १९८९ मध्ये महाडमध्ये महाड वार्ता वृत्तवाहिनीचेे संचालक म्हणून काम पाहिले. महाडमधील संजय भुस्कुटे आणि दीपक शिंदे यांनी पत्रकारितेतील महाड वार्ता या खासगी वाहिनीमार्फत आपली मुहूर्तमेढ सुरु केली आणि आज दोघांनीही याच क्षेत्रात आपले वेगळे व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केले आहे. १९९९ मध्येे दीपक शिंदे यांना सह्याद्री वाहिनीचे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व मिळाले आणि छपाई व्यवसायाला मिळविलेली उत्तुंगता तशीच कायम ठेवत इलेक्ट्रॉनिक्स चॅनेलमधील आपली कारकिर्द सुरु केली. चांदोरे गावातील प्राचीन मूर्तीचा साठा, महाड एमआयडीसी प्रकल्पातील अनेक समस्यांवर प्रहार केला. याच दरम्यान जेसीज क्लब व नंतर किशोर धारिया यांच्या हिरवळ प्रतिष्ठानची धुरादेखील दीपक शिंदे यांच्याकडे सर्वांधक होती. त्या माध्यमातून धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रमामुळे त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टकोन बदलत चालला आणि ते समाजातील विविध अन्यायकारक घटनांकडे अधिक सजगतेने पाहू लागले. जाखमाता नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा संवाद घडवून आणण्याचा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी अनेक वेळा केला आणि नागरिकांना काय हवंय आणि लोकप्रतिनिधींनी काय करायला हवे याची सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. आजही वृत्तसंकलन करताना त्या त्या समस्येबद्दल अधिक अभ्यासपूर्ण मांडणी करत एखाद्या अधिकार्‍याच्या डोळ्यात अंजन घालताना दीपक शिंदे यांचा अवतार अनेकांना भारावून जातो. वृत्त संकलनाच्या निमित्ताने चिपळूणचे प्राणीमित्र भाऊ काटदरे, महाडमधी पक्षीप्रेमी प्रेमसागर मेस्त्री, दापोलीतील दिलीप कुलकर्णी यांची ओळख झाली आणि शिंदे यांचा पर्यावरणाकडे ओढा वाढत गेला. गडकिल्ल्यांच्या वृत्तसंकलनाच्या निमित्ताने महाडमधील सुरेश पवार यांची अनोखी मैत्री जमली, राजकीय क्षेत्रात उल्का, महाजन, साकव संस्थेचे अरुण शिवकर, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातील गजानन खातू, श्रीप्रकाश अधिकारी यांचा परिचय झाला आणि एखाद्या सशक्त तरुणाला लाजवेल असा दीपक शिंदे यांचा प्रवास सुरु झाला. कधी रायगड, कधी पद्मदुर्ग तर कधी प्रतापगड अशी कधी गड स्वच्छतेची मोहिम तर कधी जागर तर कधी रायगडवरील छत्रपत शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळ्याचा वर्धापनदिन. एकीकडे वृत्तसंकलन तर दुसरीकडे जागृती करणारा आमचा मित्र दीपक शिंदे यांची अपंग म्हणून ओळख करुन देणे हे खरेच चुकीचे ठरेल. परंतू याचा असा उल्लेख केला तर इतर अपंगांसाठी दीपक शिंदे एक आदर्श ठरतात म्हणून हा प्रपंच.
दीपक शिंदे केवळ पत्रकार नाही तर संवेदना जागृत करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. सध्या ते महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानचे विश्वस्त, माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकता स्थानिक सदस्य आहेत. कोकण भूमी प्रतिष्ठानचे रायगड प्रतिनिधी म्हणून पर्यटन जागृतीसाठी काम करताहेत, लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या एनएसएस कमिटीवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे. कोकण कडा मित्र मंडळाच्या दुर्ग संवर्धनात मार्गदर्शक, रायगड प्रेस क्लबचा मार्गदर्शक, पॅट्रॉन या विमा व्यवसायातील समूहात डीएम अशा विविध स्तरात त्यांनी आपले पाय रोवलेत. विविध डॉक्यूमेंटरीज, शॉर्ट फिल्म बनविणे हा केवळ छंद नसून ते एक प्रोफेशन करण्याचा प्रयत्न दीपक करीत आहेत आणि म्हणूनच त्यांना सह्याद्री वाहिनीचा मिळालेला पुरस्कार सार्‍या पत्रकार मित्रांच्या दृष्टीने अधिक अभिमानस्पद आहे. त्यांच्या या कार्याला, त्यांच्या या जागराला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
 - गिरीश साळी, महाड़