रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील दहिवड गावात जमिनीतून स्फोटासारखे आवाज येत असल्याने गावात महिलांसह पुरुष देखील भितीच्या छायेत आहेत. एकीकडे पूर, दरड अशा संभाव्य घटनाचा मागोवा घेणारे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन आता या आवाजाने बेजार झाले आहे.
रायगड जिल्ह्यात पडणारा मुसळधार पाऊस, डोंगरातून ओढ्यात खळाळणारे पाणी, धोक्याच्या पातळीपर्यंत वाढणारे नद्यांचे पात्र पाहता रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन जेरीस आलेले असताना महाड तालुक्यातील दहिवड गावातील जमिनीतून येणारे स्फोटासारखे आवाज आता आपत्कालीन व्यवस्थापनाला हादरवत आहेत. 3 जुलै रोजी आलेली तक्रार जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनापर्यंत गेल्यानंतर जिल्हा भूगर्भशास्त्र विभागापर्यंत जाण्यास तब्बल 12 दिवसाचा कालावधी लागला. या दिरंगाईमुळे आता दहिवड गावातील महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
1967-68 सालात आलेला भूकंप, त्यानंतर नानेमाची येथील जमिनीला पडलेल्या भेगा या घटनांनंतर 3 जुलैपासून येणारे हे भयावह आवाज दहिवड गावात चिंतेचा विषय बनला आहे. काल जिल्हा भूगर्भशास्त्र विभागाच्या पथकाने दहिवड गावाला भेट दिली. परिस्थितीची पाहणी केली, चर्चा केली परंतु ग्रामस्थांचे समाधान मात्र करू शकले नाहीत.
भूगर्भशास्त्र अभ्यासकांच्या मते हे परिणाम जमिनीची धूप, मातीचे उत्खनन, नदीतील रेतीचे उत्खनन आणि गावात बेसुमार झालेले बोअरवेल व त्यातून बाहेर आलेले पाणी. तरीही यात भिती बाळगण्याचे कारण नाही कारण या आवाजाबरोबर कोणताही हादरा बसत नाही हीच जमेची बाजू आहे.
आज तेरा दिवस झाले तरी या आवाजाचे गूढ उलगडले नाहीत. यामुळे दहिवड गावातील भय संपले नाही. या आवाजाने नक्की कोणती आपत्ती दहिवड गावात ओढवेल या चिंतेने आजही येथील ग्रामस्थ रात्ररात्र जागून काढीत आहेत.

No comments:
Post a Comment